Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

‘तमाशा’

महाराष्ट्रात राहुन अजुनही ‘तमाशा’ बघायचा योग आलेला नाही. शेवटी काहीही झालं तरी ती एक लोक-कला आहे आणि म्हणुनच तो एकदा तरी बघायचाच हे मनाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात ठाम झालं आहे.

मराठी चित्रपटात दाखवतात खरंच तसा तमाशा असतो का कुठे? म्हणजे ते टिपीकल थिएटर, फेटे वाले पाटील, टोपीवाले गावकरी, स्टेजच्या कोपऱ्यात हातात ढोलकी, तुणतुणं घेतलेला फेटेवाला, दुसऱ्या कोपऱ्यात पायाने वाजणारी पेटी घेऊन पायजमा घातलेला वादक, ‘जी-जी’ म्हणणारे सहकारी आणि नृत्याचा अविष्कार सादर करणारी नर्तिका. तमाशा ‘सवाल-जवाबाचा’ असेल तर अजुनच धम्माल, मात्र त्यात अश्लिलता कुठेही नसावी.

पुण्यात चौफुल्याला तमाश्याचे असे फड रंगतात ऐकुन आहे, पण कधी ‘तिकडे’ जाणं झालं नाही. कुणी आहे का ज्याने खरा-खुरा तमाशा पाहीलेला आहे? ह्या विषयावर कुणी अजुन प्रकाश टाकु शकेल का?

मंडळी, पुढचा भाग टाकायला काही कारणांने फारच उशीर झाला. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आणि ‘मेहंदीच्या पानावर’ गोष्टीचा पुढचा भाग पोष्ट करतो..

भाग ३ पासुन पुढे..

२१ फेब्रुवारी
लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..

फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -”गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर म्हणावेसे वाटत होते की “वेड्या तो रंग तर केंव्हाच गेला, पण मनावर चढलेला तुझा रंग जातंच नाहीये

इतक्या दुरवर बाईक वरचा असुनही प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही. खाचखळग्याच्या रस्त्यातुन, ओढ्यानाल्यातुन प्रवास करताना शरीराला होणारा राजचा निसटता स्पर्श शरीरावर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत होता. क्षणभर जाणवलं, तुम्हाला हवा तो जोडीदार बरोबर असेल तर आयुष्यातले या ही पेक्षा मोठे खाच-खळगे कसे अनेक लोकं सहजतेने पारं करत असतील!

‘निधी मेहता’, पुर्णपणे मी तिच्याबद्दल विसरुनच गेले आहे. जणु काही ती अस्तीत्वातच नाही. जणु काही तिच आणि राजचं काही नातं आहे हेच मला ठाउक नाही. मी त्यांच्या नात्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ झाले होते. तिच्याबद्दल मी राजकडे एक शब्दही विचारला नव्हता आणि राजनेही तिच्याबद्दल कधी माझ्याकडे विषय काढला नव्हता. माझ्या मनामध्ये सध्या फक्त एकच गोष्ट होती.. ‘राज’

राज माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, तो मला कित्ती आवडतो, खरं तर शब्दात सांगणे अवघडच, पण शक्य असते तरीही कदाचीत ते मी इथे नक्कीच उतरवणार नाही. माझ्या मनाशिवाय ही गोष्ट कुणालाही कळु द्यायची इच्छा नाही आणि खरं तर एक भिती सुध्दा वाटते म्हणुन. सर्वांमध्ये वावरताना चेहऱ्यावर मी एक शांत, ‘कुल ऍन्ड काल्म’ असल्याचा मुखवटा घालुन वावरत असते, पण आत मधुन… प्रत्येक क्षण परीस्थीती बिघडतच चालली आहे.

२२ फेब्रुवारी
ग्रुप मधील सर्व जणं मस्तच आहेत, पण सगळ्यात इंप्रेसिव्ह, ‘करण मित्तल’, ‘मित्तल मिल्स’ चे सर्वे-सर्वा ‘कुमार मित्तल’ यांचा एकुलता एक वारस. परंतु करोडपती बाप असल्याचा किंचीतसाही अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नाही. इन्ट्रोडक्शन परेड मध्ये म्हणतो कसा, ‘कुठल्याही मुलीला मी सहज पटवु शकतो..’, मला तर हसुच आलं, काय असतात ना एक एक पात्र

आज दिवसभर आरामच होता, उद्यापासुन पुन्हा पुढचा प्रवास सुरु. हवा सुरेखच आहे.

२३ फेब्रुवारी
दिवस-भर राज आज ‘निधी’ बद्दलच बोलत होता. त्यांची ओळख कशी झाली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर कसे झाले हे आणि ते.. इतका वैताग आला होता मला. त्याला एवढे पणं कळत नाही का एका मुलीला दुसऱ्या मुलीची स्तुती, ते पण एखाद्या हॅंन्ड्सम कडुन.. सहसा सहन होतं नाही? मला कंटाळा आला होता त्याच्या ‘निधी’पुराणाचा.. कंटाळा? की राग? की जेलसी?? कुणास ठाऊक!

२४ फेब्रुवारी
काल रात्री हवा फारच खराब होती. आकाशातला निळसरपणा कुठेतरी निघुन गेला होता. पुर्ण आकाश करड्या रंगाने भरुन गेले होते. हवेतला बोचरेपणा अंगावर काटा आणत होता. कुठल्याही क्षणी आभाळ कोसळेल असं वाटत होतं. टेंटचा पडदा जरासा सरकवुन पाहीला तेंव्हा आकाश्यात विजा चमकत होत्या, परंतु पाऊस काही कोसळला नाही.

करडा रंग, नैराश्याचे, निरसतेचे प्रतिक. निसर्गाचे रंग आपल्या मनावर किती परीणाम करु शकतात नाही?

आज राज खुपच शांत, एकटा वाटत होता. त्याच्या मनामध्ये कसली तरी खळबळ माजली होती. कसली असावी?? निधी पासुन दुर असल्याची?, निधी ला न सांगता माझ्याबरोबर इथे आल्याची? का अजुन काही?? ठरवणं कठीण आहे.

सर्व ग्रुप मध्ये राज खुपच लोकप्रिय झाला आहे.. आणि का नाही होणार? प्रत्येक जण त्याच्या तोंडुन गाणं ऐकण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी धडपडत असतो. वाटतं जावं आणि राजचा हात हातामध्ये घेऊन ‘राज फक्त माझा आहे’ असं ओरडुन सांगावं. पण दुसऱ्या क्षणाला वाटतं, खरंच राज आहे माझा? जितक्या त्वेषाने माझे मन राजसाठी आक्रंदत आहे त्याच्या एक टक्का तरी माझा राजवर हक्क आहे?

मनामध्ये राज बरोबरचा हा सहवास क्षणभंगुर आहे आणि काही दिवसांनी राज परत आपल्यापासुन दुर (?) जाणार आहे ह्याची खंत/टोचणी लागुन आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर मिळणारा प्रत्येक क्षण मला जगायचा आहे.

२५ फेब्रुवारी
सुरेख वातावरणाने मनावर आलेली मरगळं कुठल्या कुठे निघुन गेली होती. आज माहीतेय मी पहिल्यांदा बाईक चालवली. रस्ता चांगला होता आणि राज मागेच लागला ‘चालव, चालव’ म्हणुन. शंभरवेळा गेअर बदलताना बाईक बंद पडली पण शेवटी जमवली कशी तरी. खुप मज्जा आली. इतकी हसले आहे मी आज.

संध्याकाळी सर्व जण उबदार शेकोटी भोवती गप्पा मारत बसलेले असताना मला राहुन राहुन असं वाटत होतं की राज माझ्याकडे बघतो आहे, परंतु माझी त्याच्याकडे बघायची हिम्मतच नाही झाली. आणि हे एकदा नाही तर दोन-तिनदा मला जाणवलं, एकदा तर माझी आणि त्याची नजरानजर सुध्दा झाली होती. मला खात्री आहे की राज अधुन-मधुन माझ्याकडे बघत असतो.. नक्कीच.. “आय नो, इट्स नॉट माय इमाजीनेशन

मला असं का वाट

२६ फेब्रुवारी
काल डायरी लिहीताना मी इतकी गुंग होऊन गेले होते आणि अचानक माझ्यामागे कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली म्हणुन मागे वळुन पाहीलं तेंव्हा राज उभा होता. तिच नेहमीची स्टाईल, निळ्या वॉश्ड रंगाचे जर्किन, त्यातुन डोकावणारा व्हॅनीला-व्हाईट रंगाचा शर्ट, एक कॉलर किंचीतशी वर गेलेली, खिश्यामध्ये हात आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य. त्याला बघताच मी डायरी खाडकन बंद केली. ‘मुर्ख आहेस का तु?’ स्वतःलाच जोरात ओरडले मी मनाशीच. इतकी घाबरले मी त्याला बघताच. ‘आय जस्ट होप की त्याने काही वाचले नसावे’. कधी कधी कुठल्या तंद्रीत असते मी मलाच कळत नाही.

सकाळी ग्रुप मधली एक जण विचारत होती, ‘बोथ ऑफ यु टुगेदर? कपल?’ आणि मी कसनुस हसुन उत्तर दिलं.. ‘नो.. जस्ट गुड फ्रेंड्स’

काल अर्धवट सोडलेली डायरी पुढे लिहीन म्हणलं.. पण काय लिहीत होते तेच लक्षात येईना.

असो, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ आधीकच वाढवत
आहे. हातातुन निसटुन गेलेला प्रत्येक क्षण मनाला तो लवकरच दुर होणार आहे ह्या विचाराने अनंत यातना देत आहे. मला लवकरात लवकर काही तरी केले पाहीजे.. पण काय? नशीबाने राजला पुन्हा एकदा माझ्यासमोर आणुन उभे केले आहे यावेळेला मी काही केले नाही तर.. तर कदाचीत, कदाचीत?? मलाच माहीत नाही तर काय होईल.

मी वेडी होईन? ती तर मी आधीच झाले आहे!, मग कदाचीत मरुन जाईन?? पण छे.. असं कुणाच्या आठवणीने कुणी कधी मरतं का? काय होईल माझं मलाचं माहीत नाही, पण जे होईल ते नक्कीच चांगलं नसेल.

मी ठरवलं आहे. मी एकदा तरी प्रयत्न करीन. राजला ह्याची पुसटशी का होईना जाणीव करुन देइन की तो मला आवडत होता आणि अजुनही तितकाच आवडतो.

“टु लेट समवन नो यु लव्ह हिम इज टु टेल हिम”, वाक्य साधं सोपं.. पण जमेल मला ते?? कदाचीत येणारा काळच ठरवेल..

[क्रमशः]

अजंठा केव्हज चे काही निवडक फोटो इथे जोडत आहे. प्रत्येक लेणींबद्दलची अधीक माहीती, त्यांचा इतिहास इथे वाचता येईल.

काही दिवसांपुर्वीच पुण्यातील रस्त्यावर एका १५ वर्षीय सायकल स्वाराला बसने ठोकरल्याने गंभीर अपघात झाला आणि पुण्यात ‘बनवलेल्या’ सायकल ट्रॅक्स चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातग्रस्त भागाचा अधीक तपास केल्यावर असे लक्षात आले की त्या मुलाने सायकल चालवताना जर सायकल ट्रॅक्सचा वापर केला असता, तर कदाचीत हा अपघात टळु शकला असता.

काही दिवसांपुर्वी माहीतीच्या आधीकाराखाली मागवलेल्या माहीतीत असा उल्लेख आला होता की डेक्कन ते कोथरूडपर्यंत (साधारण पणे ६ कि.मी.) सायकल ट्रॅक बनवलेला आहे. वाचताच मला धक्काच बसला? माझा नेहमीचा रस्ता आणि मलाच माहीत नाही. म्हणुन मग आवर्जुन शोधाशोध केली तेंव्हा रस्त्याच्या कडेला काही तुरळक पाट्या दिसल्या ज्या त्या रस्त्याला ‘सायकल ट्रॅक्स’ असे संबोधीत होत्या.

ह्या ट्रॅक्स वर काही ठिकाणी वेडी वाकडी वाढलेली मोठ्ठाली झाडं आहेत. म्हणजे काही ठिकाणी तर अक्षरशः एखाद्याला सायकलवरुन खाली उतरुन वाकुन पुढे जावे लागेल. अनेक सायकल ट्रॅक्स वर भाजीवाले, फेरीवाले, दुकानाचे बोर्ड्स, पंचरच्या दुकानाचे टायर्स सर्रास पडलेले दिसतात. अनेक ठिकाणी लोकं गप्पा मारत मध्येच उभे असतात. शेवटी एका ठिकाणी मी मुद्दामहुन सायकलची घंटा वाजवुन निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या पदरी थट्टाच पडली :-(

ज्या रस्त्यावर अपघात झाला तो कर्वे रस्ता ‘जवाहरला नेहरु नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन’ योजनेखाली येतो ज्या योगे अश्या रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक्स’ असणे आवश्यक आहे. परदेशवारी करुन आल्यावर तिथल्या योजना इथे राबवायच्या म्हणुन अनेक ठिकाणी पुण्यात सायकल ट्रॅक्स बनवले गेले आहेत. काही खरोखरच उत्कृष्ठ आहेतही, पण केवळ हातावर मोजण्यासारखेच. बाकीच्या ठिकाणी अर्धवट बांधकाम झालेले, उखडलेले, वाट्टेल तसे बांधलेले ट्रॅक्सच जास्त आहेत.

जोपर्यंत हे ट्रॅक्स वापरण्यायोग्य होत नाहीत, त्यावरील अतिक्रमणं दुर होतं नाहीत तो पर्यंत त्याचा वापर होणे कठीण. सायकल चालकांवरही त्यानंतर रस्ता वापरल्यास कारवाई होणे गरजेचे आहे. नुसतेच सायकल वापरा, पर्यावरण वाचवा, प्रदुषण टाळा, वाहतुकीवरील बोज खाजगी वाहनं कमी वापरुन कमी करा म्हणुन होणार नाही तर त्यासाठी योग्य पर्यायी मार्गाची पुर्तता होणे हे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.

“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
“काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”

ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..

दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.

कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.

मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.

दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.

तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.

कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..

मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..

हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.

ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा

दिवाळीच्या शाळांना सुट्या लागुन काही दिवस सुध्दा नाही झाले की पोरांचे घरात उद्योग सुरु झाले. गेल्या दोन दिवसांतील दोन उद्योग ऐका –

  • घरात असणाऱ्या फिश-टॅक मधील माश्यांचे परवा जोरदार हळदी कुंकु झाले. त्याचे झाले असे की मंडई मधुन हळदी-कुंकु च्या पुड्या आणल्या होत्या. आवरु नंतर म्हणुन तश्याच कडेला ठेवल्या होत्या. दुपारी बराच वेळ झाला तरी पोराचा काही आवाज नाही, आश्चर्य वाटले म्हणलं एवढी शांतता आहे, बघावं काय चालु आहे म्हणुन मागच्या खोलीत गेलो तर सगळे हळदी-कुंकु फिश-टॅक मध्ये ओतले होते आणि हातातल्या काठीने ते पाणी पोरगा ढवळत होता. सगळे पाणी रंगीत झाले होते. मासे हळदी-कुंकुवाने माखले होते.

    नशीब एखादा गचकला नाही, हो ना.. एवढे महागाचे ते शार्कस बिच्चारे वाचले, त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

  • पुन्हा एकदा अशीच दुपारची भयाण शांतता. पोरगा बऱ्याच वेळ शांत आहे म्हणल्यावर काहीतरी उद्योग सुरु आहेत हे समजुन जावे. लगेच खोलीत धाव घेतली आणि जे पाहीले ते डोक्यावर हात मारण्यासारखेच होते.

    खिडकीत तुर-डाळ धुवुन वाळत टाकली होती. आमच्या समोरच्या झाडावर भरपुर पोपट असतात. अगदी एका वेळेस कमीत-कमी १५-२० तरी नक्कीच असतात. आमचे दिव्य रत्न त्या पक्षांना मुठ-मुठ भरुन डाळ खायला म्हणुन फेकत होते. साधारण एक किलो डाळ खिडकीतुन खाली फेकण्यात आली होती.

    थांबवले तर परत आम्हालाच चिडुन म्हणतोय, ‘अरे त्या पक्षांना खाऊ देत होतो ना.. ते बिच्चारे काय खाणार मग??’

  • फक्त दोन दिवसांच्या सुट्टी मध्येच असले उद्योग, पुर्ण दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत असे काय काय उद्योग होणार आहेत हे त्या परमेश्वरालाच ठाऊक..

    ॥ ओम नमः शिवायः ॥

ओजसचे फोटो

दुपारचा फावला वेळ असला की पोराचे फोटो काढायचा चान्स मी सोडत नाही आणि जेंव्हा पोरगा स्वतःहुनच म्हणतो, “बाबा फोटो काढा नं..” मग तर काय, विचारायलाच नको. स्वारी मुड मध्ये असली की मस्त पोज देते नाही तर इतर वेळेस फार भाव खातो.

असेच आज काढलेले फोटोंपैकी काही निवडक इथे जोडत आहे..

भाग २ पासुन पुढे

१५ फेब्रुवारी

रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.

आयुष्य काय खेळ खेळत होते माझ्याबरोबर? ज्याला विसरण्यासाठी मी इतक्या दुर निघुन आले तोच पुन्हा माझ्या आयुष्यात डोकावला होता. याला काय म्हणायचे? निव्वळ योगायोग?, एक आयुष्याने केलेली एक क्रुर थट्टा? की आयुष्यात येणाऱ्या एका सुखद सुखाची चाहुल?

काहीही असो, मला त्याच्या समोर जाणं भाग होतं आणि मी गेले. मला पाहुन तो चकीतच झाला. मस्त हसला मला बघीतल्यावर. कालच रात्री आला. तो आणि ‘निधी मेहता’ दोघं निघाले होते काश्मीरला, पण तिकडे काहीतरी भानगड झाली म्हणुन दिल्लीपासुनच रस्ता बदलला आणि इकडे आले. असो.. मनातल्या मनात एका विचाराने मी खुप खुश होते.. ‘राज’ ने दोन रुम्स घेतल्या होत्या.. वेगवेगळ्या त्याच्यासाठी आणि निधीसाठी.

का कुणास ठाऊक, पण त्याने माझी आणि निधीची ओळख करुन दिली नाही. निधी दिसायला तशी छानच आहे.. हो माझ्यापेक्षाही छान, राजला शोभुन दिसते.. पण स्वभावाने मात्र आज्जीब्बात आवडत नाही मला ती..

राजशी बोलावेसे खुप वाटत होते, पण काय आणि कसं बोलणार? कोणं म्हणुन बोलणार?

संध्याकाळी दिसले होते दोघं..बाहेर जाताना.. निधीचे अगदी राजचा हात हातात धरुन, खांद्यावर डोके ठेवुन चालणं..लाडे-लाडे बोलणं फारचं वाटलं मला… वाटलं जाऊन सांगावं तिला.. ‘ए बये..जरा लांबुन, नवरा नाही झाला तुझा तो अजुन’. पण..

रात्री परतायला पण खुप उशीर झाला असावा त्यांना. मी खुप वेळ वाट बघत थांबले होते. पार्किंग मध्ये कुठल्याही गाडीचा आवाज आला तरी धावत जाऊन खिडकीतुन खाली बघत होते.. उगाचच.. खुर्चीत बसल्या बसल्याच कधीतरी डोळा लागला रात्री

 

१६ फेब्रुवारी
मनं आनंदी असलं की सारंच कसं छान वाटतं नाही? पांघरूणावर उतरलेली सोनेरी किरणं, निळं आकाश, लाल-पिवळ्या फुलांवर चमकणारे दवबिंदुंचे थेंब. सकाळ एकदम प्रसन्न होती. आज खुप दिवसांनी स्वतःला निट आवरावेसे वाटत होते.. आज खुप दिवसांनी स्वतःलाच आरश्यात परत परत पहायची इच्छा होत होती. कित्ती दिवस झाले होते, मी स्वतःला निट्सं आरश्यात पाहीलचं नव्हतं. एकदा विचार आला मनात विचारावं आरश्याला, ‘आरश्या आरश्या सांग, सर्वात सुंदर कोणं?’ पण मग उगाचच वाटलं.. आरसा ‘निधी मेहता’ म्हणाला तर!!!

टुरिस्ट सिझन जवळ येत चालला आहे आणि बाजारात सहजच एक फेरफटका मारला तर त्याची जागोजागी प्रचीती येऊ लागते.

मनं नको असतानाही राजचाच विचार करत असते. कामात असुनही त्याची चाहुल लागते का हे पहाण्यासाठी मनाचा एक कोपरा सतत मग्न असतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे.

 

१७ फेब्रुवारी
आजची सकाळ माझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली. सकाळी राज ऑफीस मध्ये आला होता. म्हणाला, एक रुम ‘चेक-आऊट’ करायची आहे. म्हणलं का? तर डोळे मिचकावत म्हणाला..’निधी माझ्या रुम मध्ये शिफ्ट करत आहे’. इतके डोक सटकलं होतं ना, ती असती समोर तर कदाचीत काहीतरी नक्कीच बोलुन गेले असते, पण मग तोच म्हणाला, निधीचे २-३ गाणी रेकॉर्डींगच्या डेट्स प्रि-पोन झाल्या आहेत, तिला जावं लागते आहे. मी मात्र आहे अजुन ७-८ दिवस इथेच. इतका आनंद झाला होता ना. वाटलं उठावं आणि त्याला कडकडुन मिठी मारावी. पण तो इतक्या जवळ असुनही खुप दुर होता.

आय ट्राईड माय बेस्ट टु स्टे ए़क्स्प्रेशनलेस, पण मला माहीत आहे, माझ्या चेहऱयाने मला नक्कीच धोका दिला असणार.

गोपाळकाकांनी आज गार्डन मध्ये छान दिव्यांच्या माळा लावल्या आणि मध्ये एक छोटासा खड्डा खणुन काही लाकडं रचुन ठेवली, संध्याकाळच्या गुलाबी थंडीत शेकोटी पेटवण्यासाठी. त्याचा वापर मीच लग्गेच सुरु केला. संध्याकाळी त्या गरम-उबदार शेकोटीने बोचरी थंडी कमी केली होती. मी शेजारीच खुर्ची टाकुन बसले होते आणि अनपेक्षीतपणे राज माझ्याइथेच येउन बसला.

‘हाय..’
‘हॅल्लो..’
….
‘अचानक इकडे कशी? रेकॉर्डींग सोडुन दिलेस की काय?’
‘बस्स.. अस्सच.. काही तरी बदल’
‘हो.. पण कुणालाही नं सांगता अचानक निघुन आलीस..’
‘:-)’
‘निधी पोहोचली?’
‘हो.. मगाश्शीच फोन येऊन गेला..’
……………..
‘बदललीस तु खुप..’
‘मी?’ (ह्याला काय माहीत मी आधी कशी होते?)
‘टेंन्शन घेतेस का कश्याचे खुप?’
‘नाही रे.. काही काय?.. आय एम कुssssल, पण तुला का असं वाटलं मी बदलले..’
‘सहजच.. वजन कमी केलेस की काय?’
‘झालं.. थोडा फरक पडतोच ना..हवेचा..’
‘हम्म.. पण आता अजुन नको कमी होऊ देउस,, आहे ते छान आहे..’
‘:-)’ (मला ना.. खरं तर काय बोलायचं तेच सुचत नव्हते. मुर्खासारखे उगाच हातातल्या पुस्तकात डोकं खुपसत होते.. पण त्याने खुप बोलावं आणि आपण ऐकत रहावं अस्सं वाटत होतं)
‘केस पण काही तरी बदललेस तु!..’
‘हो.. थोडे स्ट्रेट केलेत..’ (त्याचे निरीक्षण ऐकुन मन खुप सुखावत होतं.)
……………………………………..
‘बिझी?’ (बहुतेक माझ्या पुस्तक वाचण्याला कंटाळुन म्हणाला)
‘नाही.. मी आपलं अस्संच..’ मी ओशाळुनच म्हणाले..
‘ग्रेट.. चल मला सिमला दाखव. इतके महीने इथे राहीलीस.. चल उठ..’ मला हाताला धरुन उठवत तो म्हणाला..तो स्पर्श.. एक क्षणाचा..अंगावर हजारो रोमांच उमटवुन गेला. त्याच्या त्या मजबुत हातांच्या पकडीत मी एखाद्या बाहुलीसारखी उचलले गेले.
‘थोडं थांब.. मी चेंज तरी करुन येते..’
‘छे.. चेंज कसलं करतीस.. तु इतकी क्युट असताना, कुठलाही वेगळा ड्रेस काय कामाचा..’

खुप मस्त संध्याकाळ गेली ती.. मी जाणीवपुर्वक त्याला गर्दीची ठिकाणं टाळुन लांब पॉईंट्स वर न्हेलं. नुकत्याच मावळलेल्या सुर्याच्या लाल छटा आकाशात सर्वत्र विखुरल्या होत्या. कदाचीत राजच्या सहवासाने माझ्याही चेहऱ्यावर अश्शीच लाली उमटली असेल.. मी शक्य तेवढी राजशी नजरा-नजर टाळली.

 

१८ फेब्रुवारी
रिसॉर्ट मध्ये आज सकाळी पुणे-मुंबईच्या १०-१२ जणांचा एक ग्रुप दाखलं झाला आज रात्रं थांबुन ते सर्व उद्या बाईक्स वरुन लेह-लडाखला जाणार आहेत. ‘वॉव, कित्ती मज्जा असेल नाही?’ मी असा विचार करतच होते आणि तेवढ्यात राजने येऊन सहजच विचारले, “इथले तसेही पाहुन झाले आहे माझे.. या ग्रुप बरोबर लेह-लडाखला जायला खुप मज्जा येईल.. जायचं? येणार माझ्याबरोबर?”

आयुष्य किती घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे हिंदकाळत असते नाही? निराशेच्या गर्तेत कोसळलेले माझे आयुष्य गेल्या काही दिवसात अचानक-पणे उत्तुंग आकाशात भरारी मारतं आहेत.

लिहीता लिहिताच पॅकींग चालु आहे, एका लाईफ़-टाईम सहलीसाठी, एका लाईफ-टाईम सहवासासाठी..


गेले दोन आठवडे चालु असलेला मायग्रेन नामक डोके दुखीचा त्रास वाढतच चालला होता आणि सहन करणे अशक्य झाले होते. नेहमीच्या डॉक्टरकडे ३-४ खेपा झाल्या. दर वेळेला वेगळ्या गोळ्या, पण एक कणही फरक पडत नव्हता. कार्यालयात सुट्यांवर सुट्या पडत होत्या. शेवटी दुसरा उपाय करुन पहावा म्हणुन घराशेजारीच असलेले श्री. रामदेव बाबा यांचे आयुर्वेदीक “पतंजली चिकित्सालया”त जाऊन पहावे असा विचार मनामध्ये आला. बऱ्याच लोकांकडुन चांगले रिझल्ट्स ऐकुन होतो शेवटी जाऊन आलोच.

अपेक्षा आजाबात केली नव्हती, पण दुसऱ्या दिवसापासुनच खुsssप फरक पडला. डोकेदुखी अगदी थांबली नसली तरी जाणवण्याइतपत कमी झाली.

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या अमेरीका गावातल्या क्लायंटच्या ‘कॉल’ मध्ये क्लायंटला माझ्या आवाजातला फरक लग्गेच जाणवला. बऱ्याच दिवसांनंतर बरा वाटत होतो. म्हणुन मग त्याने आस्थेने चौकशी केली. काय उपचार केले, कसा काय फरक पडला एकदम. म्हणुन मग मी त्याला माहीती सांगीतली. इथे एक ‘रामदेव बाबा’ म्हणुन आहेत, त्यांचे ‘आयुर्वेदिक क्लिनिक्स’ आहेत, त्यांच्या जडी-बुटीने फरक पडला. खुप प्रसिध्द आहेत ते. त्यांचे योग-शिबीर फार प्रसिध्द आहेत, लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित रहातात वगैरे.

इतर नॉन-भारतीयांप्रमाणे त्याचीही योग, आयुर्वेद वगैरे शब्द ऐकल्यावर चिकित्सा जागृत झाली म्हणुन त्याने इंटरनेट्वर सर्च मारला आणि रामदेव-बाबा बघुन तो जरा दचकलाच. त्याच्या लेखी एखादा सुटा-बुटातला डॉक्टर असावा बहुदा.

त्याने लगेच आय.एम वर मला रामदेव-बाबांच्या फोटोची लिंक पाठवली आणि विचारतो कसा..

“इज धिस जेंटलमेन चेक्ड यु? इज ही अ डॉक्टर?”

मग त्याला समजावले, अरे बाबा क्लिनिक्स त्याचे आहेत, पण तो नाही येत इकडे तपासायला. तो औषध बनवतो आणि योग-विद्येचे ज्ञान देतो. रामदेव-बाबांचे यु-ट्युब वरील व्हिडीओ बघुन तो खुपच प्रभावीत झाला होता आणि मी त्याची (अत्यंत कडवट, अत्यंत घाणेरड्या चवीची) अत्यंत गुणकारी ठरलेली औषधं घेऊन.

त्यामुळे आजच्या तारखेला मी जरूर म्हणु इच्छीतो ‘रामदेव बाबा कीssss जय!!!’

मंडळी,

काही मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉग्स चे पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये आले आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. आपलाच एक मित्र “विक्रांत देशमुख” याने सकाळीच मला समस(SMS) करुन याबद्दल माहीती दिली.

लोकसत्ता, पुणे विभाग, शेवटच्या पानावर याचा उल्लेख सापडेल, किंवा या दुव्या वर टिचकी मारा.

पुढील पत्ते आजच्या लोकसत्ता मध्ये झळकले आहेत -

http://kantala.blogspot.com
http://mokale-aakash.blogspot.com
http://sadaaphuli.blogspot.com
http://sanjopraav.wordpress.com
http://marathisahitya.blogspot.com
http://unhalyachisutti.blogspot.com
http://rainbasera.blogspot.com
http://tulipsintwilight.blogspot.com
http://aavarta.blogspot.com
http://samvedg.blogspot.com
http://www.punekar.net
http://www.meghanabhuskute.blogspot.com
http://abhijitbathe.blogspot.com
http://e-shal.blogspot.com
http://samvaadini.blogspot.com
http://manatale.wordpress.com
http://shabdaanchyaadeshaat.blogspot.com

जरा जुन्या पोस्ट्स »