कार्यालयात येत असतानाच मित्र म्हणाला, ‘सेहवाग सुटलाय नुसता’
संगणक चालु करुन लगेच ‘क्रिकईन्फो.कॉम’ चालु केले. खरंच राव, चौकारांना सुरुवात झाली होती. ८ च्या रन-रेटने खेळत होते.
“च्यायला हा तेंडल्या बघ, नुसता शांत उभा आहे, विचारले की म्हणतो, माझा खेळ परीपक्व झालाय, मी संयमी खेळी केली, आय वॉज एन्जॉयींग विरुज इनींग वगैरे..”
थोड्यावेळाने तेंडल्या सुध्दा सुरु होतो.
“आयला, कश्याला दोघं पण तुडवताय, एकाने शांत नको का रहायला??”
विरुचे ५० होतात. “जाईल बघ आता हा, टिकुन राहील जरावेळ तर शप्पथ..”
तेंडल्या आणि विरू दोघंही श्रीलंकन गोलंदाजांना बधत नसतात. तेंडल्याही ५० मारुन घेतो. जरा बरं चाललं आहे म्हणायला जावं तर कुठे तरी माशी शिंकते आणि तेंडल्या आऊट.
“कसला रे हा मास्टर ब्लास्टर, अजुनही क्लिन बोल्ड होतो.”
धोनी अवतरतो.
“घ्या आले महाराज. गंभीर फॉर्म मध्ये आहे, त्याला नको का पाठवायला? काय दिवे लावणार हा असा मध्ये येऊन?”
पण नाही. धोनी स्वतःवरील विश्वास सार्थ ठरवतो आणि ‘धोनी धुलाई केंद्र” सुरु होते. दोघंही जण गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत असतात. अंदाजे स्कोर ३०० मग ३५०, ४०० आणि मग चक्क ४५० पर्यंत येऊन पोहोचलेला असतो.
कार्यालयात कामात लक्षच लागत नसते आणि अचानक क्लायंट कॉलची वेळ येऊन ठेपते. भारतीय वंशाचा अमेरीकेतील क्लायंटसुध्दा मॅचमध्ये गुंग असतो. कित्तेक वर्षाने आज कॉल मध्ये कामा-व्यतीरीक्त गप्पा होतात. कॉल लगेच संपतो आणि परत नजरा लंच-रुम मधील एल.सी.डी किंवा संगणकपटलावरील स्कोरकार्डकडे वळतात.
विरूचे शतक झालेले असते.
“आज हा असाच खेळत राहीला ना, तर २०० मारतो.”
“अरे २०० सोड, १९८ मारले तरी खुप झाले, त्या सईद-अन्वरचे नाव वर बघवत नाही राव”
कुणी म्हणायचाच अवकाश आणि विरेंद्र सहवाग गचकतो.
“झालं.. संपलं. टिकुन रहायची सोयच नाही.”
“अरे, तो काय तेंडल्या आहे का रेकॉर्ड साठी खेळायला, नैसर्गीक खेळ त्याचा..”
रैना गंभीर कडुन आशा लागलेल्या असताना ते अपेक्षाभंग करतात. धोनी सुध्दा गचकतो.
अपेक्षीत स्कोर पुन्हा ३७० वाटायला लागतो.
“कसली रे आपली भक्कम फळी? एक गेला की मागे रांगच लागते. काही अर्थ नाही बघ.”
“हो ना, आणि पिच इतके चांगले आहे. जयसुर्या, दिल्शान आणी संगकाराचे हात खाजत असतील. मला तर वाटतं ३०-४० ओव्हर्समध्येच संपवतील मॅच.”
विराट कोहली क्रिज मध्ये असतो.
“अरे एकदातरी तुझं टीम मध्ये असणं जस्टीफाय कर!, निदान आज तरी खेळ”
तडफडत स्कोर कसाबसा ४०० पार करतो आणि ४१४ वर मॅच संपते.
आता वेळ असते श्रीलंकेची. दिल्शान आणि थरंगा ओपनींग करतात. दिल्शान चा धडाका सुरु होतो. गोलंदाजांना तुड-तुड तुडवत सुटतो.
“कसले रे आपले हे गोलंदाज. वाईड काय, हाल्फ पिच काय, फुल-टॉस काय. छ्या. लायकीच नाही आपली जिंकायची.”
“काही नाही, हरलेच पाहीजेत, त्याशिवाय ताळ्यावर येणार नाहीत.”
झहीर नाही, नेहरा नाही, प्रवीण कुमार नाही, हरभजन नाही. कुणी सुटत नाही त्यांच्या तडाख्यातुन.
“मला तर वाटते आपण १०० एक रन कमी पडणार आहोत”
शेवटी रैनाकडुन ब्रेक मिळतो. थरंगा जातो. पण आपण आगीतुन फुफाट्यात पडतो. संगकारा टी-२०च्याच मुड मध्ये असतो.
“उगाच थरंगा आऊट झाला राव, चालले होते ते बरे होते.”
आता काही खरं नाही. सगळे आप-आपल्या कामाला लागतात. पण नकळत नजर स्कोरकार्ड कडे जात असतेच.
मिस-फिल्डिंगला उधाण आलेले असते. कॅच वर कॅच सुटत असतात.
“श्या.. अजुनही कोणी आऊट नाही. काय करतोय आपला कॅप्टन कुल?”
श्रीलंकन धुलाई-केंद्र जोरात चालु असते, आणि तळ्यातला गणपती पावतो. संगकारा आऊट.
पुन्हा एकदा दुर्दम्य आशावाद जागृत होतो.
जयसुर्या, भारताचा काळ अवतरतो.
“हा तर बघ आता काय करतो ते..” असं म्हणेपर्यंत जयसुर्या सुध्दा आऊट.
“अमेझींग.. वॉव.. जियो धोनी आणि भज्जी….”
पाठोपाठ अनपेक्षीतपणे दिल्शानही परततो.
पण डॅमेज झालेले असते. मॅच श्रीलंकेच्या अजुनही हातात असते.
गणपती बाप्पा सुध्दा आता फार्मात आलेले असतात. काही तुरळक शॉट्स नंतर जयवर्धने रन-आऊट होतो.
“चला, चमकला बाबा कोहली कुठेतरी.. वेल थ्रो..”
पाठोपाठ कंदंबीला सुध्दा तेंडल्या रन-आऊट करतो.
“जेष्ठ खेळाडूंनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला”
“तेंडल्या ने टिकाकारांची तोंड बंद केली.”
शेवटुन दुसरी ओहर जहीर अल्टीमेट टाकतो. पुन्हा रन-आऊटस होतात.
शेवटची ओहर. सगळे लंचरुम मधील एल.सी.डी. समोर जमलेले असतात.
मॅनेजर शोधत येतो..”अरे ५.१५ ला मिटींग होती ना..” स्कोर बघुन तो सुध्दा थबकतो.
६ बॉल ११ रन.
गर्दीमध्ये उभी असलेली नेहराची बायको सुध्दा टेन्स्ड असते.
“हा नेहरा घोळ घालणार बहुतेक”
“पिच चांगले आहे, एक थिक एज, एक गुड शॉट आणि संपले सगळे”
“अरे हा धोनी एवढा शांत कसा? जरा बॉलरजवळ जावं उगाचच चर्चा करावी, फिल्डींग चेंज करावी म्हणजे बॅट्समन वर टेन्शन येते रे…”
शेवटच्या ओव्हरचा प्रत्येक बॉल श्वास रोखणारा असतो.
शेवटचा बॉल… १ बॉल ५ रन.
पुन्हा एकदा चेतन शर्माच्या त्या ओव्हरची कडु आठवण जागी होते.
‘सिक्स नको राव मारायला..”
“फोर पण नको आहे रे..”
“नेहराने नो बॉल टाकला नाही म्हणजे मिळवले.. नाहीतर एक रन एक्स्ट्रा आणि परत फ्रि-हिट”
भयानक टेंन्शन..
नेहरा शेवटचा बॉल टाकतो आणि फक्त एक रन….
भारत जिंकला..
टाळ्यांचा कडकडाट..
बाहेर मुलाखतीसाठी आलेला उमेदवार स्वतःशीच .. “भारी कंपनी दिसतेय राव.. इथेच सिलेक्शन व्हायला पाहीजे..”
शेवट गोड होतो… सर्वांच्या चर्चा, शिव्या शाप, सल्ले, कौतुकाचा वर्षाव तुर्तासतरी थांबतो, पुढची मॅच सुरु होई पर्यंत……
Like this:
Be the first to like this post.