आज म्या देव पाहीला


मराठी चित्रपटसृष्टीचा सम्राट ‘अशोक सराफ’ हे नाव ज्या मराठी माणसाला माहीत नाही असा खरंच विरळाच म्हणावा. कित्तेक चित्रपट आपल्या कलेने अजरामर केलेले श्री. अशोकजी प्रत्येक रसिकाच्या मनात आपले स्थान अजरामर करुन आहेत. त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट घडणार हे पक्क झाले आणि मी हरखुनच गेलो.

अशोक सरांचा माझ्या स्मरणातला पहीला चित्रपट म्हणजे ‘एक डाव भुताचा’, मावळ्याच्या वेशातील अशोक सराफ ‘ए मास्तुरे.. फुर्र..’ करुन गावात नव्याने आलेले मास्तर ‘दिलीप प्रभावळकरांना’ हाक देतात आणि त्यांची मदत करतात. आजही तो चित्रपट माझ्या स्मरणात आहे. तेथुन जे त्यांचे स्थान माझ्या मनात निर्माण झाले ते आजपर्यंत अढळ आहे.

त्यानंतर अनेक चित्रपट अशोकजींनी केले. त्याबद्दल, त्यांच्या कलाकृतीबद्दल लिहावे इतके शब्द सामर्थ्य नक्कीच माझ्याकडे नाही आणि तितकी क्षमताही माझ्यात नाही. त्यांच्या इतक्या वर्षाच्या चित्रपट सृष्टीतील माझ्या मनात ठसलेल्या काही कलाकृतींपैकी ‘धुमधडाका मधील’ अख्या-उख्खी-एख्खे करणारा म्हातारा, ‘अश्विनी ये ना’ करत नाचणारा, ‘माझा पती करोडपती’ मधील ‘आधी कुकु लाव’ म्हणुन विधवेचे नाटक करणार्‍या सुप्रियाला खडसावणारा नाटकी मेजर, ‘एका पेक्षा एक’ मधील चणे खाणारा पोलिस, ‘आयत्या घरात घरोबा’ मधील गोपुकाका, ‘अशी ही बनवाबनवी’ मधला ‘हा माझा बायको’ म्हणुन लक्ष्मीकांत बेर्डेची ओळख करुन देणारा धनंजय माने, ‘कळत-नकळत’ मधील ‘गालावरच्या पुरीच म्हणणं तरी काय’ म्हणत छोट्यांना हसवणारा सदुमामा हे अगदी ठासुन मनात बसलेले चित्रपट आहेतच पण असेही कित्तेक ‘शे’ चित्रपट आहेत ज्यांची कदाचीत नाव माझ्या कमकुवत मेंदुच्या लक्षात रहात नसतील पण अशोक-सराफ सरांचा चित्रपट टी.व्ही. वर दिसला की रिमोटवर चाळा करणारी बोटं आपोआप थिजतात.

जितक्या सहजतेने त्यांनी आपल्याला हसवले तितक्याच सहजतेने क्षणार्धात भावुक होऊन त्यांनी रसिकांच्या डोळ्यात अश्रु उभे केले आहेत. त्यांच्याबाबत अधीक काय लिहावे? फक्त ‘अशोक सराफ’ हे नावच इतक्या गोष्टी बोलते की बस्स..

आणि म्हणुनच त्या दिवशी अशोक सरांशी माझी भेट होणार ह्या विचारांनीच इतका आनंद झाला की तो शब्दात वर्णने खरंच कठीण आहे. सकाळपासुन काय काय बोलायचे ते कित्तेक वेळा स्वतःशीच रटुन झाले होते.

अशोक सरांना भेटायला आलेल्या मंडळींची रांगच लागली होती. मी मात्र दुर, शांत बसुन होतो. मला घाई गडबडीत त्यांना भेटायचे नव्हते. एखाद्या देवालयात गर्दीला कसं भराभर पुढे ढकलली जाते आणि मग इतक्या वेळ रांगेत थांबुनही निट दर्शन नाही झाले म्हणुन मनाला हुरहुर लागुन रहाते ती हुरहुर मला अनुभवायची नव्हती आणि म्हणुनच मी गर्दी कमी व्हायची वाट पहात होतो.. आणि मग तो क्षण आला. मी अशोक-सराफ सरांसमोर उभं होतो. तिन अंकी नाटकातील सॉल्लीड परफॉर्मंन्स नंतरही त्यांचा चेहरा अजुनही टवटवीत होता.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे, ऐकुन होतो.. आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. इतके शांत, चेहर्‍यावर फक्त एक हास्य, बोलका चेहरा आणि नम्र भाव.. खरंच वाटलं ‘आज म्या देव पाहीला’, आणि कंठच दाटुन आला. काय बोलावे काहीच सुचेना, ऐनवेळी शब्दांनी दगा दिला. कित्तेक लाखो लोकांनी त्यांना ‘तुमचा अभिनय आवडतो’, ‘तुमचे चित्रपट आवडतात’ वगैरे गोष्टी हजारो लाखो वेळा सांगीतल्या असतील, मग मी वेगळं काय सांगु?

नकळत मी खाली वाकलो आणि देवाचा चरण-स्पर्श अनुभवला. मनामध्ये त्यांचे असंख्य चित्रपट, त्यांची असंख्य रुप, त्यांचे विनोदी संवाद क्षणार्धात तरळुन गेले. त्या एका क्षणात वाटले हजारो वर्ष उलटली. आणि त्या एका क्षणानेच मला आठवण करुन दिली ‘अशोक सराफ’ ह्यांचे अनेक यशस्वी चित्रपटातील सहकलाकार ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ह्यांची. वाटलं एकदा विचारावं, ‘तुम्हाला पण आठवण येते का हो त्यांची?’ पण दुसर्‍याच क्षणी त्या प्रश्नांतील फोलपणा लक्षात आला. उगाच आठवणींची ती तार छेडणं मला योग्य वाटेना आणि मी तो विचार सोडुन दिला.

ज्या ज्या लोकांना मामांचा अखंड सहवास लाभला आ्हे, लाभतो आहे अश्या लोकांचा मनस्वी हेवा वाटला.

काय बोलावं काहीच कळेना, शेवटी मी सांगुन टाकलं.. मला खरंच शब्द सुचत नाहीत काय बोलावं.. इतकं काही ठरवुन आलो होतो, इतकं काही बोलावसं वाटत होतो, पण.. आणि मामा म्हणाले.. “तुमच्या भावना पोहोचल्या” मी मामांशी हस्तांदोलन केले आणि त्या क्षणाला मी माझ्या आठवणींमध्येच बंद करुन ठेवले.

आत्ताही मी ही पोस्ट लिहायला बसलो आणि पुन्हा एकदा मनात अनेक विचारांची गर्दी झाली..पण ते बाहेरच पडेनात.. शब्दच कमी पडत आहेत. हे असंच होतं का? हो कदाचीत असंच होत असावं! देवाबद्दल लिहायचं तर तेवढं देवत्व आपल्यात हवं.. नाही का?

ही पोस्ट वाचताना मला लक्षात येते आहे की जे मला म्हणायचे होते, लिहायचे होते त्यातले फारसे काही उतरलेच नाहीये शब्दात. असेन मी लोकांच्या लेखी चांगला लेखक, भले मला, माझ्या ब्लॉगला पुरस्कार मिळाले असोत, भले आज मी एक कमर्शीयल नाटक लिहीतो आहे, पण इथे मात्र आज माझे शब्द खरंच अडकले. असो, मला त्याची पर्वा नाही, कारण हा लेख लिहीताना अशोकजींचा हा सर्व सुवर्णकाळ पुन्हा एकदा मनामध्ये तरळुन गेला, पुन्हा एकदा त्यांची भेट डोळ्यासमोर आली आणि हे माझ्यासाठी खुप आहे.

अशोक मामा तुमच्या त्या छोट्याश्या भेटीबद्दल शतशः धन्यवाद. ही भेट मी आयु्ष्यभर मनामध्ये जपुन ठेवीन..आणि देवाजवळ प्रार्थना करेन की तुम्हाला भेटायचे भाग्य मला पुन्हा पुन्हा लाभो.

स्वप्नपुर्ती….

तीन वर्षांपुर्वी जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा हा ब्लॉग मला कुठंवर घेऊन जाईल ह्याची यत्कींचीतही कल्पना तेंव्हा नव्हती. परंतु पहील्या दिवसांपासुनच वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तो अजुनही कायम आहे.. किंबहुना यत्कींचीतही वाढलाच आहे.

ह्या ब्लॉगने मला असंख्य मित्र-मैत्रीण दिल्याच शिवाय स्टार-माझा तर्फे ‘ब्लॉग-माझा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवुन देऊन टी.व्ही. वर झळकण्याची संधीसुध्दा दिली. बघता बघता ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकवर्गाची संख्या सुध्दा आता १२ लाखाच्या वर जाऊन पोहोचली आहे.

हे कमी की काय म्हणुन आता अजुन एक मानाचा तुरा खोवुन घेण्याचा योग ह्या ब्लॉगच्या रुपाने मला मिळतो आहे.

आज माझी ओळख केवळ एक ब्लॉगर म्हणुन न रहाता एका कमर्शीयल नाटकाचा लेखक म्हणुन होऊ पहात आहे.

साधारण एक महीन्यांपुर्वी मुंबईस्थीत ‘निलमंगल एंन्टरटेंमेंट’ ह्या प्रॉडक्शन हाऊसने माझा ब्लॉग वाचुन संपर्क केला. ते एका रोमॅन्टीक-कॉमेडी नाटकाच्या शोधात होते आणि त्यांच्या पुढच्या नाटकाची स्क्रिप्ट मी लिहावी असा जणु आग्रहच त्यांनी धरला.

आजपर्यंत केवळ कथा-लेखनच केलेले असल्याने आणि माझं नाटकं पहाणं तसं कमीच असल्याने एकुणच मला जमेल की नाही ह्याबद्दल साशंकता होती, पण सुरुवात केली आणि बघता बघता एक छोटंस उगवलेले रोपट आज नाटकाची स्क्रिप्ट म्हणुन पुर्णत्वास येत आहे. नाटक अर्थात सर्व टीमच्या पसंतीस पडले आहे आणि लवकरच कास्टींग पुर्ण होईन रिहर्सल्स सुध्दा सुरु होतील.

केवळ स्वप्नातच पाहीलेले आज प्रत्यक्षात उतरताना पाहुन कोण आनंद होतो आहे आणि हे केवळ शक्य होते आहे ते तुम्हा सर्वांनी ब्लॉगवर दाखवलेल्या प्रेमामुळे, वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रियांमुळेच. तुम्हा सर्वांचे शतशः धन्यवाद.

नाटकाची प्रोग्रेस, कास्टींग, रिहर्स्लल्स च्या गमती जमती सर्वकाही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच पण त्यासाठी ‘फेसबुकावरील’ डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा पेज नक्की लाईक करा म्हणजे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.

अर्थात ही केवळ एक सुरुवात आहे, अजुन अश्या काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहे ज्या मला एक प्रतिथयश लेखक म्हणुन प्रसिध्दी देतील, अर्थात त्याबद्दल आत्ताच सांगणे योग्य ठरणार नाही.. योग्य वेळ आली की सांगेनच…

परंतु त्यापुर्वी एक टिझर…….

नोंद – चित्रं, महाजालावरुन साभार. नाटकाचे फोटोशुट व बॅनर बनेपर्यंत एक प्रतिकात्मक म्हणुन हे चित्र इथे जोडले आहे ह्याची नोंद घ्यावी.

“ऊह ला ला…” एक रसग्रहण

वाचकहो, मला कल्पना आहे तुम्ही ब्लॅकमेल कथेच्या पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहात, त्यामुळे मधूनच आलेल्या ह्या पोस्ट बद्दल मी दिलगीर आहे. परंतु तुम्ही ह्या रसग्रहणाचाही आनंदाने आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे.

‘डर्टी पिक्चर’ ह्या बहु-चर्चित चित्रपटातील विद्या बालन आणि नसरुद्दिन शहा ह्या कलाकारांवर चित्रित झालेले ‘ऊह ला ला’ हे गाणे आधीच हिट झाले आहे. त्या गाण्याच्या रसग्रहणाचा हा एक छोटासा प्रयत्न.

 

गाण्याची सुरुवात होते तेंव्हा आपल्याला जाणवते कि कुठल्याश्या चित्रपटातील गाण्याच्या शुटींगचा हा सेट आहे.. आणि इथे चित्रीकरण चालू आहे. नायिकेच्या इतर अवयावांवरून फिरून मग कैमेरा तिच्या चेहऱ्यावर स्थिर होतो. प्राचीन, ऐतेहासिक चित्रपटांमध्ये नाग-देवता, पातळ-देवता वगैरे भूमिका वठवणाऱ्या नायिका ज्या प्रकारचा वेष परिधान करायच्या तश्याच प्रकारचा काहीसा वेष इथे नायिकेने परिधान केलेला आहे. डोक्यावर सोनेरी रंगाचा नाग नसल्याने तसली काही भूमिका ही नायिका करत नाहीये हे रसिक प्रेक्षक समजून जातात.

नायिकेच्या अवती-भोवती रंगीत नक्षीकाम केलेली मडकी एकावर एक रचून ठेवलेली दिसतात. आवाज न करणारे रंगीत धुराचे बॉम्ब मागे फुटत असतात. एकूणच दृश्य रसिकांना तोहफा किंवा तत्सम चित्रपटातील गाण्यांची आठवण करून देतात आणि प्रेक्षक थोडेसे नोस्तालीजिक होतात.

हा आह….
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..
हो ओ हो..

पहिल्याच वाक्यात ‘हा आह….’ असा वेदनेने पिडीत नायिका आवाज देते. प्रथम दर्शनी ही वेदना असली तरीही नायिकेच्या आजूबाजूला नृत्य करणाऱ्या सहकारी कलाकार आनंदाने नाचत बागडत ‘हो ओ हो’ असे काहीसे म्हणत असतात, संगीतही आनंदी असते ह्यावरून ही वेदना खचित सुखद असावी ह्याची खात्री पटते.

स्स्स…
छुटकी जो
तुने काटी है
जोरीसे काटी है
यहा वहा…

नायिकेला कसली वेदना झाली असावी ह्याची उकल आपल्याला ह्या कडव्यात होते. चावट नायकाने नायिकेला इकडे तिकडे चिमटे काढलेले आहेत आणि ह्याचीच तक्रार नायिका गाण्याच्या सुरुवातीला करते.

रुठी हू
मै तुझसे रुठी हू
मुझे मना ले ना
ओ जाने जान

नायकाच्या ह्या कृतीचा नायिकेला राग आलेला आहे आणि त्यामुळे नायिका नायकावर रुसलेली आहे ह्याचा अविष्कार आपल्याला ह्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळीत होतो. नायिका एखाद्या अल्लड बालीकेसारखी नायकावर रुसलेली आहे ह्या विचाराप्रत रसिक येतात न येतात, तोच पुढच्या दोन ओळीत नायिका नायकावर चिडलेली नसून तिचा तो राग, राग नसून लाडिक पणा आहे हे कवी आपल्याला जाणवून देतो.

‘हे नायक, मी तुझ्यावर (खोटी कोटी) चिडलेली असले तरीही तू मला मनवावेस, माझी प्रेमाने समजूत काढावी असे मला वाटते’ असेच काहीसे नायिका इथे सांगू इच्छिते. ‘ओ जाने जान’ असे नायकाला प्रेमाने म्हणून तिने आपले प्रेम व्यक्त केलेले आहेच, पण त्याच बरोबर तू मला चिमटे काढलेस तरीही मी चिडलेली नाहीये असे सुचवले आहे.

छेडेंगे
हम तुझको
लडकी तू है
बडी बोम्बार्ड
आहा आहा आहा आहा

आपला नायकही काय बुळा नाहीये. नायिकेच्या ह्या लटक्या रागाची त्याला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच तो लगेच तिची माफी न मागता तिला

छेडेंगे हम तुझको….

असे म्हणून मोकळा होतो.

कवीच्या अफाट शब्द-सामर्थ्याची प्रचीती आपल्याला पुढील दोन ओळीत येते. तो नायकाच्या मुखातून नायिकेला ‘बोम्बार्ड’ असे काहीसे संबोधतो. ‘टंच’, ‘मादक’, ‘बेफाम’, ‘आयटम’, ‘माल’ अश्या प्रचलित शब्दांना बगल देऊन कवीने ‘बोम्बार्ड’ ह्या ऑफ-बीट शब्दाची निवड करून सर्वांनाच चकित केले आहे.

ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
ऊह ला ला…
तू है मेरी फैंटसी

ऊह ला ला… ह्या शब्दाचा हिंदी शब्दकोशात विशेष असा काही अर्थ नाही. बहुदा हा शब्द इंग्रजी “Oooh laa laa” ज्याचा अर्थ.. ‘आईशप्पथ..’, ‘वॉव’ असा काहीसा होऊ शकतो अश्यावरून घेतलेला असावा. ह्या ओळी केवळ यमक जुळावे किंवा, कवीच्या मनात विचारांची इतकी गर्दी झाली असावी कि त्याला ते विचार शब्दात मांडता येत नसल्याने त्याने ‘ऊह ला ला… ‘ ह्या शब्दांचा आधार घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु विचारांचा हा गुंतता लगेच सुटतो आणि कवी नायक-रूपाने नायिकेला ‘फैंटसी’ संबोधतो. पुन्हा एकदा, कवीला इथे दाद द्यावीशी वाटते. ‘स्वप्नातली राजकुमारी’, ‘सपनोंकी रानी’, ‘ड्रीम गर्ल’ अशी पारंपारिक विशेषणे वगळून कवीने ‘फैंटसी’ वापरलेले विशेषण खरोखर लाजवाब आहे.

प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही कल्पना असतात. परंतु फैंटसी हा शब्द त्याला लागू होत नाही. फैंटसी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या जोडीदारात मिळाली तर बहारच, अशी गोष्ट जी केवळ परीकथेत असू शकते, किंवा…….

असो..

छु ना ना
छु ना ना
छु ना ना
छु ना ना
अब मै जवान हो गयी…

ह्या कडव्यामध्ये नायिका नायकाला आपण तरुण झालो आहोत आणि म्हणून तू मला हात लावू नकोस असे सांगत आहे. हे सांगत असतानाच कैमेरा नायिकेच्या चेहऱ्यावर येऊन जातो. प्रेक्षकांनी नीट पाहिल्यास नायिकेच्या चेहऱ्यावर आलेली एक तारुण्य-पिटिका नजरेस पडेल. नायिका तरुण झाली असल्याचे एक द्योतक म्हणूनच ही तारुण्य-पिटिका दाखवण्याचा मोह कैमेरा-मैनला झाला असावा.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये विशेष असे कांही घडत नाही. नायिका नायकाला ‘मी तरुण झाले आहे..’ तर नायक नायिकेला ‘तू माझी फैंटसी आहेस’ असेच वारंवार सांगत बसतात. बहुदा कवीच्या घरी पाहुणे आले असावेत किंवा दूरचित्रवाणीवर एखादी क्रिकेट ची मैच चालू असावी त्यामुळे कवीने हि दोन कडवी, पाट्या टाकल्या सारखी लिहिली आहेत.

चित्रीकरणामध्येही फारसे काही विशेष घडत नाही. नायक-नायिका रुळावरून पुढे सरकणार्या ट्रोली वर उभे राहून इकडे तिकडे फिरत बसतात.

पण चाणाक्ष प्रेक्षक हे जाणतीलाच कि हि वादळापुर्वीची शांतता आहे.

हा…
छुआ जो
तुने तो
दिल ने मारी सिटी

स्त्री-मुक्तीचा जमाना असल्याने आजकाल स्त्रियांनी शिट्टी वाजवल्यास त्यात नाविन्य वाटत नाही त्यामुळे नायिकेचा मौडर्न पणा दाखवण्यासाठी कवी म्हणतो कि नायकाने जेंव्हा नायिकेला स्पर्श केला तेंव्हा नायिका इतकी खुश झाली कि चक्क तिच्या ‘दिले ने’च शिट्टी मारली आहे.

फलाटावरून सुटताना रेल्वे जशी शिट्टी मारते तसेच काहीसे नायिकेच्या ‘दिल’चे झाले आहे आणि आता तेही पूर्ण ‘सुटलेले’ आहे.

जे प्रेक्षक केवळ चित्रिकरणाकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलाकडे लक्ष देऊन आहेत, त्यांना हे जाणवले असेल कि आधीच्याच कडव्यांमध्ये नायिका नायकाला वारंवार ‘छु ना ना’ म्हणून सांगत होती पण तरीही ‘स्त्री-लंपट’पणा करत नायकाने नायिकेला स्पर्श केलेला आहे आणि आता काही खर नाही बघा..

उगाच नाही इव्ह आणि आदम ला सफरचंद खाऊ नका म्हणून सांगितले गेले होते..

दे दे इन गालोन पे
एक पप्पी
मिठी मिठी

संधीचा फायदा घेऊन नायक नायिकेकडे एका पप्पीची मागणी करताना ह्या कडव्यात दिसून येतो.

पुन्हा एकदा कवीला इथे दाद. ‘चुंबन’, ‘चुम्मा’ सारखे शब्द न वापरता ‘पप्पी’सारखा निरागस परंतु तोच परिणाम साधणारा शब्द कवीने इथे वापरला आहे. ‘पप्पी’, ‘पापी’ असे शब्द साधारणपणे लहान मुलांबरोबर वापरले जातात. तो शब्द इथे वापरला असल्याने लहान आणि किशोर-वयीन मुलांना हे गाणे आपलेसे वाटावे म्हणून कवीने हा कावेबाजपणा केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढच्या दोन कडव्यांमध्ये कवीने निसर्गाला सामील करून घेतलेले आहे.

हिंदी चित्रपट-सृष्टी मध्ये पावसाला अढळ स्थान आहे. भय-कथा, गुन्हेगारी कथा मध्ये अंधारी रात्र, विजांचा कडकडाट आणि कोसळणारा पाउस वातावरण निर्मिती करतात, नायकाचा द्वेष करणाऱ्या नायिकेचे नायकाबरोबर कुठेतरी जाताना पावसामुळे अडकणे आणि मग रीतसर प्रेमात पडणे असतेच. आणि चित्रपट संगीत तर पावसाशिवाय अपूर्णच आहे.

इथे नायक रुपी कवी म्हणतो -

यौवन तेरा
सावन भरा
भिग गया
दिल ये मेरा

नायिकेच्या तारुण्याने मुसमुसलेल्या यौवनाला कवीने इथे ‘सावन’ची उपमा दिली आहे. ‘बिन बादल बरसात’ म्हणतात तसेच काहीसे इथे नायकाचे झाले आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो..

यौवन तेरा, सावन भरा….. भिग गया, दिल ये मेरा!!!

पावसात भिजल्यानंतर ‘जवानी’ला आग वगैरे लागते हे आतापर्यंत सर्व-श्रुत आहे. काही चतुर प्रेक्षकांनी ह्याचा अनुभव सुद्धा घेतलेला असेल. असेच काहीसे नायिकेच्या बाबतीत झालेले असणार.

‘सागर’ चित्रपटातील ‘जाने दो ना’ ह्या ऋषी कपूर आणि डीम्पल कपाडिया वर चित्रित झालेल्या गाण्याची आठवण करून देणारी लाल रंगाची साडी घालून खट्याळ नायिका नायकाला दोष देत म्हणते..

आहा.. तुने ही
बरसात कराई
क्या करे
ये यौवन
बेचारा बेचारा बेचारा ….

असे लाडिक आरोप करून झाल्यावर पुन्हा एकवार ‘ऊह ला ला..’ चा जयघोष सुरु होतो आणि पुन्हा एकवार नायक नायिकेला तू माझी ‘फैंटसी’ आहेस सांगतो तर ‘मला छु नकोस’ असे नायिका नायकाला आठवण करून देते.

अह्हा..
अह्हा..
अह्हा..
अह्हा..
उई मा …

असे काहीसे वात्रट आवाज पुढे काहीतरी गरम घडणार ह्याची ग्वाही देत असतानाच, नायिकेच्या उरोजांना झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारा साडीचा पदर अखेर घसरतोच.

८० च्या दशकातील मिथुन-दाची आठवण करून देणाऱ्या बप्पी-दा चा आवाज नायक रुपाने म्हणतो..

गीराके अपना पल्लू
बार बार
कर देती हो हमको
बेकरार

आधीच्याच कडव्यात नायिकेने नायकावर आरोप केले होते त्यातच नायिकेचा ‘पल्लू’ घसरतो त्यामुळे घायाळ झालेला नायक अश्या प्रकारे आपली व्यथा मांडतो …. नायिकेच्या ह्या मादक रूपाने घायाळ झालेले प्रेक्षक, नायकाशी पूर्णपणे सहमत होतात..

परंतु आपली नायिका एकदम ‘पोहोची’ हुई चीज आहे.. ऐकून घेईल तर ती कसली.. ती पुन्हा एकदा नायकावरच घसरत म्हणते…

आग लगाई
तुने तन मै
क्या करे ये
पल्लू बेचारा
बेचारा ..
बेचारा ..

यौवन, दिल ह्यावरील नायीकेचा याआधीच ताबा सुटलेला होता. “छु ना” वारंवार सांगूनही नायक नको त्या गोष्टी करत जातो आणि आता परिस्थिती इथवर येऊन ठेपली आहे कि नायिकेचा तिच्या पदरावर सुद्धा ताबा राहिलेला नाहीये..

ह्यानंतर पुन्हा बहुतेक कवी टी.व्ही. समोर मैच बघायला बसतो आणि जुनीच कडवी पुन्हा कॉपी-पेस्ट करून गाणे संपवून टाकतो.

१०,००,००० / दश-लक्ष / वन-मिलीयन

मंडळी,

“डोक्यात भु्णभुणणारा मराठी भुंगा” असे विचीत्र नाव परीधान केलेल्या ह्या ब्लॉगच्या वाचकांची संख्या आज १०,००,००० अर्थात दश-लक्ष अर्थात वन-मिलीयन झाली. आश्चर्य, आनंद, अभिमान, कृतज्ञता अश्या अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत ही पोस्ट लिहीत आहे.

इतक्या कमी कालावधीत आणि ते सुध्दा ब्लॉग कुठेही जोडला नसताना, आणि ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ ह्या उक्तीनुसार लिहीन तर चांगले तेच, उगाच फाफट-पसारा न लिहीता केवळ ३०० नोंदींच्या जोरावर आज हा टप्पा पार पडत आहे, आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त.. आणि फक्त तुम्हा रसिक वाचकांमुळेच. आणि त्यामुळेच हे यश, हा आनंद तुम्हाला समर्पीत.

 

तुमच्या ऋणातच रहाण्यासाठी, तुमचे आभार न मानता, ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा हीच अपेक्षा ठेवतो…

~ अनिकेत

ब्लॉगचा नवीन पत्ता:www.अनिकेत.Co.CC

ब्लॉग मराठी मधून असताना ब्लॉगचा पत्ता इंग्रजी मध्ये का? एकदा का भुंगा डोक्यात भुणभुणायला लागला की मग शांत बसण कठीण, माझ तसेच झाले, हा प्रश्न मला काही शांत बसू देईना, शेवटी आज त्याला उत्तर सापडले आणि ब्लॉग चा नवीन पत्ता तयार झाला…

www.अनिकेत.Co.CC

ब्लॉगचा जुना पत्ता [http://manatale.wordpress.com] चालूच राहिल ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.

चला, आता मोठ्ठा विकेंड सुरु होतोय.. कुठे असेन माहित नाही म्हणून आधीच गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ई-साहित्य

आज सहज महाजाल चाळत असताना बुकगंगा.कॉम नावाच्या साईटवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे [मराठी आणि इंग्रजी भाषेतील] साहित्य ई-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध असल्याचे आढळले म्हणून ती लिंक इथे लगेच शेअर करत आहे.

खर तर माझ्यादृष्टीने हि लज्जास्पद गोष्ट आहे कि मी यापैकी एकही पुस्तक अजून वाचलेले नाही. पण आता नकळत संधी सांधून आलेली आहे तेंव्हा श्री-गणेशा करतो.

डाऊनलोडच्या पानावर जाण्यासाठी इथे टिचकी मारा.

ती…..

कॉलेजचे लेक्चर ऑफ मिळाल्याचा आनंद क्षणभंगुरच टिकला कारण गाडी काढेपर्यंत आकाश काळ्या ढगांनी भरुन गेले होते. घरी जाईपर्यंत पाऊस पडणार हे खचीतच होते. वैतागुन गाडी काढली आणि शक्य तितक्या वेगाने घराकडे गाडी पळवली.

चांदनी चौक पार करुन गाडी एन.डी.ए वरील माळरानाकडे वळवली.

काही आठवड्यांपुर्वीचं उन्हानं रापलेल पिवळधम्मक गवत पावसाच्या आगमनाने हिरव्याकंच शालुत लपेटलं गेलं होतं. पिवळ्या, गुलाबी रंगाची फुलं त्या गवताआडुन डोकावुन डोकावुन आपलं अस्तीत्व सिध्द करत होत्या. वार्‍याच्या झोक्याबरोबर झाडांच्या फांद्या बेधुंद होऊन झुलत होत्या. पण माझं लक्ष मात्र वेधुन घेतलं ’ति’नं. ’ती’ आमच्या कॉलेजमधली.. प्रत्येकाला आपलीच व्हावी अशी वाटावी अशी ती…

दोन्ही हात पसरवुन ती डोळे मिटुन आकाशाकडे पाहात दुरवर उभी होती.

मी गाडी कडेला लावली आणि शक्य तितक्या तिच्या जवळ जावुन तीला न्हाहाळु लागलो.

काळ्याभिन्न मेघांच्या पार्श्रवभुमीवर तिचा तो पांढरा सफेद चुडीदार उठुन दिसत होता. तिच्या चेहर्‍यावर पावसाचे रुपेरी, टपोरे थेंब बसले होते. मला पावसाचा इतका हेवा वाटला ना.. तिच्या अंगाला घट्ट बिलगुन बसला होता तो, तिच्या चेहर्‍यावरील पावसाचे थेंब सुध्दा तिच्या गालावरुन उतरायला तयार नव्हते, स्वतःच्या आगमनाने इतरांना अडकवुन ठेवणारा तो इथे मात्र तिच्या काळ्याभोर केसांमध्ये अडकुन बसला होता. मोठमोठ्या झाडांना हेलावुन सोडणारा तो सोसाट्याचा वारा इथे मात्र तिच्या केसांमध्ये मंद मंद रुंजी घालत होता.

तिच्या पापण्यांची होणारी नाजुक हालचाल मनाला कावरं-बावरं करत होती. तिच्या श्वाच्छोश्वासांचा आवाज ढगांच्या गडगडाटातही मला स्पष्ट ऐकु येत होता.

वार्‍याची पुन्हा एक लहरं आली आणि तिच्या केसांची बट तिच्या चेहर्‍यावर जाऊन विसावली. परंतु तिने चेहर्‍यावरचे केस बाजुला घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही.

वाटलं, तिच्या जवळ जावं, तिच्या चेहर्‍यावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब ओंजळीत भरुन घ्यावेत..पावसाच्या शिडकाव्याने हवेत पसरलेल्या भिजलेल्या मातीच्या सुखंदापेक्षाही जास्त सुखद, जास्त मादक, मनावर आनंदाचे तरंग निर्माण करणारा तिच्या केसांमधला तो तजेलदार सुगंध श्वासामध्ये भरुन घ्यावा. तिच्या शरीराची उब, थंडगार पडलेल्या माझ्या शरीरावर ओढुन घ्यावी.

नुसत्या विचारांनीच अतीव सुखाने डोळे मिटले गेले आणि शांतपणे झाडाला टेकुन उभा राहीलो.

डोळे उघडले तेंव्हा ती माझ्या समोरच उभी होती. तिची नजर माझ्या डोळ्यांना भेदत आरपार हृदयाला जाऊन भिडली. अचानक तिच्या सामोर्‍या येण्याने मी भेदरुन गेलो. काय बोलावे काहीच सुचेना.. सारवासारव करण्यासाठी तोंड उघडले, पण शब्द घश्यातच अडकले.

ती माझ्याकडे बघुन खुदकन हसली आणि हृदयाचा एक ठोका चक्क क्षणभर थांबुन गेला.

तिने माझा हात धरला आणि मला हळुवारपणे पावसात ओढले. तिचा तो स्पर्श…… अंगावर काटा आला… मानेवरचे केस उभे राहीले. मी हिप्नॉटाईझ झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत गेलो.

जमीनीवरील हिरवीगार गवताची पाती पावसाच्या आगमनाने जितके प्रफुल्लीत झाली नसतील तितकी तिच्या ओढणीच्या स्पर्शाने ती मोहरुन जात होती. गुलाबी फुलं तिच्या गालावर पसरलेल्या लालीशी बरोबरी करण्याचा असमर्थ प्रयत्न करत होती. जमीनीवर साठलेल्या तांबुस-चॉकलेटी पाण्याला झालेला तिच्या पावलांचा स्पर्श त्याला बेभान करुन टाकत होता.

मी कुठे वहावत चाललो होतो, माझं मलाच ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… माझंही तस्संच झालं होतं..

माळरानाच्या एकदम कडेला मी तिच्याबरोबर येऊन पोहोचलो. समोर धुक्यात हरवलेलं माझं गाव होतं.. पावसांच्या सरीत भिजलेले रस्ते होते, नखशिखांत नटलेले डोंगर होते.

ति एका खडकावर बसली, मी तिच्या शेजारीच.. तिला खेटुन बसलो..

माझी मान आपसुकच तिच्या खांद्यावर विसावली. पावसाच्या थेंबाने भिजलेला वारा सर्वांगाला झोंबत होता. भिजलेले शरीर त्या थंड वार्‍याने शहारत होते.

तिने माझ्या हातावर तिची ओढणी पांघरली.. इतक्यावेळ धडधडणारे हृदय आता शांत झालं होतं. आसमंतातले सर्व आवाज जणु माझ्या कानापर्यंत येऊन परत गेले होते. स्पेस.. अवकाशातली शांतता जणु आजुबाजुला विखरुन पडली होती.

मी जड झालेले डोळे उघडुन तिच्याकडे पाहीले.. साखरेसारखे तिचे गोड डोळे मी कित्तेक वेळ पहात राहीलो.

तिने तिच्या बोटाचे नख माझ्या मनगटापासुन खांद्यापर्यंत फिरवले. तो स्पर्श मला अंगावर हजारो मोरपिस फिरवल्यासारखा भासला. नकळत माझा हात तिच्या मानेवरुन फिरत तिच्या नाजुक गळ्य़ापर्यंत आला.

आवेगाने तिने मला घट्ट मिठी मारली….. तिचा गरम श्वास माझ्या मानेवर रोमांच निर्माण करत होता. तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाला जणु काही सांगु पहात होती.

सुखाच्या त्या परमोच्च क्षणात बुडालेले असतानाच मागे उभा राहीलेला पोलीस म्हणाला…”ओ लैला मजनु.. चला उठा इथंन.. आपल्या घरी जाऊन रोमान्स करा.. उठा………………………………..”

टिप: लेख काल्पनीक आहे, वाचकांनी उगाचच कश्याचा कश्याला संबंध लावु नये ही विनंती…….

लाईफ़ इन आय.टी.

कि-बोर्ड च्या बटनांच्या आवाजाने संपुर्ण आसमंत भरुन गेलेला आहे. वातावरणात एक प्रकारचा तणाव, कायमचाच भरलेला असतो. बाहेरच्या ऍटेंन्डन्स बोर्डला गळ्यातल्या कार्डने नोंद करुन काचेचे दार उघडुन आत आले की हा लगेच तणाव जाणवतो.

भयाणं.. अंगावर दडपण आणणारा..

आपल्या मागे काचेचे दार बंद होते आणि आपला आणि जगाचा जणु भौतीक संपर्कच तुटतो. काळ्या काचेच्या खिडकीतुन बाहेरील वेळ कळणे केवळ अशक्यच असते. बाहेर उन आहे का पाऊस आहे, वादळ आले का जगबुडी झाली, जोपर्यंत ती बातमी इंटरनेट वर येणार नाही तोपर्यंत आतील लोकांनी त्याबद्दल काही कळण्याचा काही मार्गच नसतो.

शनिवार-रविवारची जोडुन आलेली सुट्टी सुध्दा चेहऱ्यावर प्रसन्नता आणु शकत नाही.

इन-बॉक्स मध्ये ऑर्कुट, फेसबुक वर आलेल्या मित्रांच्या नोंदीची मेल्स असतात. पण वाचत बसणे जवळ जवळ अशक्यच होऊन गेलेले असते. कारण साता-समुद्रापार बसलेल्या क्लायंटच्या विकेंड्ची सुरुवात अनेक कामं ऑफ्लोड करुन झालेली असते.

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी.

कामाच्या दडपणाचे भुत क्षणाचाही विलंब न करता मानगुटीवर चढुन बसते.

बोटं कि-बोर्ड वर सराईतपणे फिरु लागतात. प्रोजेक्ट मॅनेजरची लाल-उद्गारवाचक चिन्ह असलेली महत्वाची मेल प्रोजेक्ट ‘येल्लो फ्लॅग’ मधुन ‘रेड फ्लॅग’ मध्ये गेल्याची बातमी देत असते.

भितीची एक लाट अंगावरुन धावत जाते. कुणाला घाम फुटलेला असतो तर कुणी भितीने आधीच गारठलेले असते. थिजलेल्या शरीराव ए/सी चा थंडगार वारा काटे आणत असतो.

‘कॉफी?’ संगणकाच्या पडद्यावर बाजुच्याच क्युब मध्ये बसलेल्या मित्राचा मेसेज फडफडतो. शरीरावर चढत असलेले दडपण दुर करण्यासाठी तुम्ही उठण्याचा विचार करता, पण समोर साठलेला कामाचा ढीग पाहुन,

‘नो यार, बिट बिझी! लॅटर’
‘ऑल राईट, सी या’
तुमची विनोद बुध्दी जागृत होते, तुम्ही तेवढ्यात त्याला म्हणता, ‘cya म्हणु नकोस, त्याचा अर्थ वेगळा होतो, खोटं वाटते तर गुगल वर cya शोध’

तुम्ही मान उंचावुन त्याच्याकडे बघता, त्याच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव बघुन तुम्हाला हासु येते.. क्षणीक.. आणि परत कामात मग्न होता.

दरवेळी मदतीला हमखास धावणारे गुगल नेमके आजच बावचळल्यासारखे करत असते. मिळणारे अनेक पर्यायांपैकी एकही तुम्हाला उपयोगी पडत नसतो. तासभर प्रयत्न केल्यावर तुमची चाळवा-चाळव सुरु होते. तुम्ही पुन्हा एकदा मान उंचावुन बघता.

दुसऱ्या क्युबीक मधील एका कन्येशी तुमची नजरानजर होते. ती दोन्ही डोळे मिचकावुन एक हास्य फेकते. तुम्ही हास्य देऊन परत इतरत्र पाहता. मानेवरुन फिरणारे हात, नखांचे कुरतडणे, बोटांची टेबलावर लयबध्द टिक-टिक. प्रत्येकाचंच घोडं कुठेना कुठे अडलेले असते.

संगणकाच्या पटलावर पुन्हा एकदा मेसेज फडफडतो.. ‘कॅन यु कॉल मी नाऊ’ क्लायंट उगवलेला असतो. तुम्ही चरफडता. ‘साले, रात्री झोपत नाहीत का? यांना ना नवरे ना बायका, मोकाट सोडलेल्या वळु सारखे फिरत असतात.’

कॉल सुरु होतो.. तो बोलत असतो, तुम्ही ऐकत असता. कॉल संपतो. तुम्ही चरफडत बाहेर येता. प्रोजेक्ट मध्ये थोडा बदल असतो ज्यामुळे तुम्ही केलेले खुप सारे काम स्क्रॅप झालेले असते. पुन्हा नविन सुरुवात, पुन्हा नविन उमेद.

आठवड्याचे चार दिवस सतत १२-१६ तास काम करुन तुमचा कलीग थकलेला असतो. शुक्रवारी तरी घरी वेळेवर जाऊ या विचारात असतानाच एक ‘एस्कलेशन’ येते. तो जाम वैतागलेला असतो. क्लायंटला कळकळीच्या स्वरात विचारतो, ‘आठवडाभर १६ तास काम केले आहे, एक्सलेशन p2 च आहे, सोमवारी बघीतले तर चालेल का?’

थोड्यावेळाने तुमच्या बॉसला क्लायंटचा फोन येतो, ‘आमचे कॉन्ट्राक्ट तुमच्या कंपनीशी आहे, तुमच्या एखाद्या इंजीनीयरशी नाही. तो १२ तास काम करतो का १६ तास त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही, तुम्ही मागता तेवढे पैसे आम्ही देतो, आम्हाला आमचे काम वेळेवर करुन हवे.’

शुक्रवारची संध्याकाळ सोडाच, आता शनिवार-रविवार सुध्दा त्याचा राहीलेला नसतो.

‘बाबा मला सायकल शिकवा ना..’ पोराची आर्त विनंती या आठवड्यात सुध्दा अर्धवटच रहाणार या विचाराने त्याच्या डोळ्यात पाणी तरळते.

दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. बायकोने डब्यात प्रेमाने दिलेले अन्न ए/सी मुळे गारठलेले असते. एव्हाना तुमची खाण्यातुन वासना गेलेली असते. डबा परत कसा न्हायचा म्हणुन तुम्ही कसंबसं पोटात ढकलता.

क्षणभर विरंगुळा म्हणुन आलेल्या स्क्रॅप्स, ट्विट्स, मेसेजेसला तुम्ही पटापट उत्तर देऊन टाकता. बॅकेच्या स्टेटमेट्स वर एक नजर जाते. काहीच उरलेले नसते. गलेलठ्ठ दिसणारा पगार इनकम-टॅक्स नामक अक्राळ-विक्राळ भस्मासुराने आधीच गटकलेला असतो. उरलेला पैसा इ.एम.आय ने महीन्याच्या पहिल्या आठवड्यातच उचललेला असतो.

कुणाच्या घरात बारसं, कुणाचे पहिले वाढदिवस, कुणाच्या ऍनीव्हर्सरी, तर कुणाच्या पालकांची साठीचे कार्यक्रम ठरत असतात. तुमच्या दृष्टीने पंचांगाची किंमत शुन्य असते. महत्वाचे असते ते प्रोजेक्ट डेडलाईन्सचे कॅलेंडर.

तुमच्यापैकीच कोणी परदेशात स्थाईक झालेले असता. आपला आनंद, आपले सुख तुम्ही निसर्ग-रम्य स्थळांभोवती, बर्फामध्ये फोटो काढुन, हॅलोविनचे भोपळे हातात घेऊन काढलेले फोटो सोशल-नेटवर्कींग वर शेअर करुन मित्र-मंडळींना जळवु पहाता. तुमच्याकडे बोलण्यासारखे सांगण्यासारखे खुप काही असते. परंतु दिवाळी-दसरा, रक्षाबंधन, श्रावण-सणाला तुमच्याकडचे शब्दच थिजुन जातात. शेअर करण्यासारखे काहीच रहात नाही.

कुठुन आय.टी. मध्ये आलो.. पश्चातापाचा एक विचार पुन्हा एकदा डोक्यात तरळुन जातो. मित्राने एकदा सांगीतलेले असते, ‘अरे तुला माहीत आहे, तो शंकर महादेवन आहे ना, तो संगणक तज्ञ होता आधी!, ओरॅकल मध्ये कामाला होता. पण तो वेळीच बाहेर पडला. आता बघ तो कुठे पोहोचला!.’

तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या आठवतात. ‘लकी गाय’, त्याला शक्य झाले, आपणं कधी बाहेर पडु शकतो या जंजाळातुन?

मौत का कुवा! डोक्यात जुन्या आठवणी जाग्या होतात. तो मोटारसायकल वाला त्या विहीरीत गोल गोल फेऱया मारत असतो. प्रचंड वेगाने, तेच तेच, त्याच त्याच गोष्टी, परंतु प्रचंड एकाग्रता. एक छोटीशी चुक, एक क्षण विश्रांती आणि होत्याचे नव्हते होऊन जाऊ शकते.

थांबला तो संपला….

समोरच्या भितीवर लावलेल्या अनेक देशांमधील वेळ दाखवणाऱ्या घड्याळांचे काटे फिरत असतात.. न थांबता.

कंटाळवाण्या मिटींग्ज्स, ट्रेनींग सेशन्स, निरर्थक बडबड डोक्यावर आदळत असतात. तुमचा मौल्यवान वेळ वाया चाललेला असतो.

तुमच्याच ग्रुप मध्ये एक नविन ‘बकरा’ रुजु झालेला असतो. आज पहिलाच दिवस असतो. घड्याळात ७ वाजलेले बघुन तो आवरा-आवर करुन बाहेर पडत असतो. तेवढ्यात मॅनेजर त्याला गाठतो..

‘जा रहे हो?’
‘हा सर!’
वेळ माहीत असुनही घड्याळात एक कटाक्ष..
‘अच्छा ठिके.. जाओ.. वैसेभी तुम्हारा आज पहेला दिन है.. आदरवाईज, धिस इज जस्ट अ हाल्फ डे, इजंट इट?’

त्याची ती थंडगार स्माईल पुन्हा एकदा सर्वांगावर काटा आणते..

वेलकम टु द वर्ल्ड ऑफ आय.टी….