ब्लॉगचा नवीन पत्ता:www.अनिकेत.Co.CC

ब्लॉग मराठी मधून असताना ब्लॉगचा पत्ता इंग्रजी मध्ये का? एकदा का भुंगा डोक्यात भुणभुणायला लागला की मग शांत बसण कठीण, माझ तसेच झाले, हा प्रश्न मला काही शांत बसू देईना, शेवटी आज त्याला उत्तर सापडले आणि ब्लॉग चा नवीन पत्ता तयार झाला…

www.अनिकेत.Co.CC

ब्लॉगचा जुना पत्ता [http://manatale.wordpress.com] चालूच राहिल ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.

चला, आता मोठ्ठा विकेंड सुरु होतोय.. कुठे असेन माहित नाही म्हणून आधीच गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

दिपावलीच्या शुभेच्छा

“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा” ब्लॉगच्या सर्व वाचकांबरोबरच इतर सर्व मित्र आणि मैत्रिणींना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

~ अनिकेत

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना हार्दीक शुभेच्छा.

देवाला एकच विनंती, भारत देशाची आम्ही शाळेत घेतलेली प्रतिज्ञा आम्हाला विसरु देऊ नको. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या ह्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या पानावर एक स्थान आहे, ते असेच निढळ राहु देत.

भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

जय हिंद… जय भारत

दोन वर्षापुर्वी बनवलेल्या एका छोट्याश्या, आधीच पोस्ट केलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मला पुन्हा एकदा इथे जोडत आहे.. एकच विनंती म्हणुन.. “……जरा याद करो कुर्बानी..”

खालील व्हिडीओवर टीचकी मारून तुम्ही ती पाहु शकता.

लख लख चंदेरी

एक लाक वाचकांची संख्या झाली होssssss

बघता बघता “डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली सुध्दा. हा ब्लॉग सुरु केला २० मार्च २००९ रोजी. म्हणजे फक्त १० महिने आणि १८६ पोस्टमध्येच हा लाख भर वाचकांचा टप्पा ह्या भुंग्याने पार केला.

सकाळी वाचकांची संख्या ९९,३०० च्या आसपास पाहुन ‘तो’ दिवस आजचा असणार का? अशी एक अनामीक हुरहुर मनामध्ये होती. आधी ६०० मग ४००, ३००, १०७, ८५, ३८ वाचक राहीले होते. दुपारपासुन माझ लक्ष सारखं ‘स्टॅट्स’ वरच लागुन होते. शेवटी संध्याकाळपर्यंत ८०० हुन अधीक वाचकांनी ब्लॉगला भेट देऊन हा ‘एक लाख’ वाचकांच्या मैलाचा दगड पार करवुन दिला.

ब्लॉग सुरु करण्याचा एकमेव उद्देश होता आणि तो म्हणजे मनाचे जे स्वःगत चालु असते ते कुठे तरी उतरवणे. डायरी लिहीणे हा प्रकार कालबाह्य झाला आणि त्यात लिहीण्याचा आळस. त्यामुळे उगाचच कागद-पेन खर्ची न घालता ते संगणकाच्या सहाय्याने उतरवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग होता. सुरुवातीला वाटले होते की दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारा आपला ब्लॉग असेल. पण तो वाटलं त्यापेक्षा अधीक कठीण निघालं. महेंद्र, कसं काय जमतं बुवा तुम्हाला?

दुसरा पर्याय होता तो म्हणजे सुचत असलेल्या कथा उतरवणे. फार पुर्वीपासुन इच्छा आहे हो, आपलं एखादं तरी पुस्तक छापायचेच. पण मेला कोणी प्रकाशकच भेटत नाही. मग म्हणलं ह्या (फडतुस) गोष्टींना आपल्या ब्लॉगवरच स्थान द्यावे आणि अनपेक्षीतपणे थोडंफार जमु लागलं.

ब्लॉगच्या ह्या यशाचे सर्वच्या सर्व श्रेय जाते ते वाचकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना. पोस्टला मिळालेली प्रत्येक कमेंट ही माझ्या दृष्टीने लाख मोलाची होती, आहे. त्यामुळेच माझा उत्साह वाढत गेला. मनापासुन सांगतो, मला माझा ब्लॉग कध्धीच आवडला नाही. ह्यातील कुठलीही पोस्ट ‘पब्लीश’ केल्यानंतर मी पुन्हा वाचली नाही, वाचणार नाही. परंतु हा ब्लॉग वाचकांच्या पसंतीस उतरला ह्याचा मला फार आनंद वाटतो.

दोन चार दिवसांपुर्वीच ‘रुचीता’ नामक एका वाचकाने एका रात्रीत माझा ब्लॉग बराचसा वाचुन काढला. प्रत्येक कमेंटमध्ये ‘आता रात्रीचे २ वाजले आहेत’, ‘आता ३’ तर ‘आता सकाळचे ४ वाजले आहेत’ असा उल्लेख होता. मी इतका खुश झालो होतो, त्या कमेंट मी सर्व मित्रांना दाखवत होतो. रात्रीच्या वेळी ब्लॉग वाचुनही झोप आली नाही म्हणजे ब्लॉग नक्कीच बरा असणार, नाही का? अश्या प्रतिक्रियांनीच खरं तर लिहीण्याचे बळ दिले.

गेल्या वर्षी ‘स्टार माझा’ने आयोजलेल्या मराठी ब्लॉगस्च्या स्पर्धेत ‘डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा’ने बाजी मारली हा प्रकार माझ्या दृष्टीने अजुनही अविश्वसनीय आहे. माझे आई,वडील काय किंवा बायको, बहीण, भाऊ काय, कोणीही अजुन ह्या ब्लॉगवर फिरकले देखील नाही ये :-(

आज, खरं सांगायचे तर मी थोडासा भावनाविवश जरुर झालो आहे. इतरांचे असते तसे माझेही ह्या ब्लॉगशी एक घट्ट, जिव्हाळ्याचे नाते आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कारणाने हा ब्लॉग माझ्या मनात राहीलेला आहे. फावल्या वेळी ब्लॉग्स वरील प्रतिक्रियांचा, नविन लिहावयाच्या पोस्टचा विचार सतत मनामध्ये चालु असायचा. आपले लिखाण आधीकाधीक कसे चांगले करता येईल हा विचार मनामध्ये रुंजी घालत रहायचा.

मराठीब्लॉग्स.नेट चे सहकार्यही ह्यामध्ये खुप आहे. त्यांच्यामुळेच माझ्या ब्लॉगला इतका वाचकवर्ग लाभु शकला. त्याबद्दल त्यांचे खुप आभार.

“डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा”च्या वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार. त्यांच्या ब्लॉगवरील प्रेमामुळे, लोभामुळे, प्रोत्साहनामुळेच ही उंची गाठणे शक्य झाले. यापुढेही तुमचे ह्या ब्लॉगवरील नाते अस्सेच कायम राहील अशी आशा करतो.

शेवटची एक पुणेरी सुचना :-) ब्लॉगचे एक लाख वाचक झाले म्हणुन लगेच ब्लॉगच्या चालकांकडे पार्टीची (ओली किंवा सुकी) मागणी करु नये. ब्लॉगचे चालक हे उभरते लेखक आहे, कुठल्या खानावळीचे मालक नाहीत.

मकर संक्रांत

आज १४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. हा सण मला खुप म्हणजे खुप म्हणजे खुपच आवडतो. ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात. मला काळा रंग खुप म्हणजे खुप आवडतो.

ह्या दिवशी सर्वांना तिळगुळ द्यायचा असतो. मेंदु म्हणतो आपण तिळाचा हलवा द्यायचा, तो स्वस्त असतो आणि इतरांकडुन तिळाच्या वड्या घ्यायच्या. आमच्या घरी पण तिळाच्या वड्या बनवल्या आहेत पण न आवडणारी लोकं घरी आली तर आम्ही तिळाचा हलवाच देतो.

१४ तारखेला माझ्या दोन मित्रांचे वाढदिवस असतात. ‘मधुरा गोडबोले’ आणि ‘केशव काळे’.

ह्या काळात पतंग उडवायचे असतात. पण मी उडवत नाही. मला पतंगाची कणी बांधता येत नाही आणि तसेही मांजा हाताला काचतो. एवढे प्रयत्न करुन उडलाच पतंग तरी कोणतरी तो काटतो आणि पैसे वाया जातात.

१४ तारीख चोरांना आज्जीब्बात म्हणजे आज्जीब्बात आवडत नाही कारण ह्या दिवसापासुन दिवस मोठ्ठा होत जातो आणि रात्रं लहान होत जाते. त्यामुळे त्यांना चोऱ्या करायला वेळ कमी मिळतो. मला पण रात्र कमी झालेली आवडत नाही, झोपायला फार कमी वेळ मिळतो, सकाळी सुर्य लवकर उगवतो त्यामुळे झोपमोड होते.

अजुन एका कारणाने मला संक्रांत आवडत नाही ते म्हणजे सकाळी उठल्यावर न्हाहारीला कालच्या दिवशी भोगीला बनवलेली, उरलेली मुगाच्या डाळीची खिचडी आणि उरलेल्या भाकरीचा चुराच असतो, तर दुपारी जेवायला प्रसादाच्या नावाखाली कुठलीतरी घाणेरडी भाजी खावी लागते. आई सारख्या तिळाच्या वड्या खाऊन देत नाही कारण त्यामुळे म्हणे खोकला येतो.

कधी कधी आमच्याकडे गुळाच्या पोळ्या सुध्दा बनवतात. पण मला पोळीची कड आवडत नाही. फारच ती कडक असते, आणि त्यात गुळ जास्ती नसल्याने ति गोड पण लागत नाही.

चाळीतल्या बायका एकत्र जमुन हळदी-कुंकु, हळदी-कुंकु खेळतात आणि त्याला तुळशीबागेत मिळणाऱ्या स्वस्तातल्या प्लॅस्टीकच्या वस्तु भेट म्हणुन देतात.

नको नको म्हणत असतानाही आम्ही संक्रांतीला सॅन्ट्रो गाडी घेतली होती, ती पण काळ्या रंगाची आणि एका वर्षातच त्या गाडीला काहीतरी मोठ्ठा लोच्चा झाला त्या दिवसांपासुन आम्ही संक्रांतीला काही म्हणजे काहीच खरेदी करणं बंद केले आहे.

असो, माझे मनोगत लांबत जाते आहे. त्यापेक्षा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन टाकतो -

तीळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू

“डोक्यात भुणभुणणाऱ्या मराठी भुंग्या”च्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!!

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी

“एsss चला उठा लवकर, ५.३० वाजुन गेले..”
“काय कटकट आहे! सुट्टीच्या दिवशी सुध्दा झोपुन देत नाहीत”
“उठा आणि आंघोळी उरकुन घ्या.. आज नरकचतुर्दशी आहे, सुर्य उगवायच्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जाल..”

ही नरकाची भिती फार असते बाबा नरकचतुर्दशीला..

दिवाळीची पहाट, कोणी तरी अतीउत्साही आधीच आंघोळ उरकुन खाली “मीच पहिला” दाखवण्यासाठी दणादण ऍटंबॉंब फोडत असतो. आजची थंडी नेहमीपेक्षा जास्तच असते. तेल लावण्यासाठी कपडे उतरवायला सुध्दा नक्को वाटते अगदी.

कढत पाणी आज जास्तच कढत भासत असते.. आंघोळीचा पहिला तांब्या अंगाअंगावर रोमांच उठवुन जातो. बादलीत टाकलेले अत्तराचे थेंब, उटण्याचा सुवास, मोती साबणाचा सुगंध मन सुवासीत करत असते.

मध्येच कुडकुडत औक्षण उरकते, एखादी फुलबाजी उडवली जाते.. पण लक्ष लागलेले असते पुढचा गरम पाण्याचा तांब्या घेण्याकडे. सोपस्कार पार पडले की ‘आवरा औघोळी..’ ऐकु येईपर्यंत मस्त गरम पाण्याची आंघोळ चालु रहाते.

दिवाळीसाठी आणलेले कपडे तसेच बॉक्स मध्ये कपाटात पडुन असतात. त्याची लेबल्स, टाचण्या, शर्टला लावलेली कॉलर काढण्यापासुनची कार्य पार पडल्यावर तो अंगात चढवला जातो. आवरुन होत नाही तो पर्यंत फटफटायला लागलेले असते. लग्गेच फटाक्यांची पिशवी, उदबत्ती घेउन घोळक्यात ‘हॅप्पी दिवाली’ पासुन ते ‘पहील फटाका कुणाचा’ चर्चा सुरु होतात.

तेवढ्यात कोणीतरी ओरडते..’ए सुतळी लावलाय..’ हात आपसुकच कानावर जातात. धाड आवाज होऊन बॉम्ब फुटुन जातो.

कुणाचा सुतळी, कुणाचा चौकोनी, कुणाची लक्ष्मी तर कुणाचा बुलेट बॉंम्ब धडाका चालुच असतो. रस्ता कचऱ्याने भरुन वहात असतो. हात फटाक्याच्या दारुने माखलेले असतात..

मग पोटातली भुक जागी होते, एक एक करत सगळे पांगतात घरातला फराळ उरकायला. पोटभर चकल्या, करंज्या, लाडु, चिवडा आणि इतर पदार्थ दामटल्यावर आरश्यात एक नजर टाकुन परत घोळका जमु लागतो, कोपऱ्यावरील गणपतीच्या देवळातल्या ‘देवी’ दर्शनासाठी..

हम्म.. दिवाळी आली तर, प्रकाशाचे, आनंदाचे, मांगल्याचे, चैतन्याचे प्रतिक घेउन.

ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो ही शुभेच्छा

दसऱ्याच्या शुभेच्छा

सर्व मराठी ब्लॉगर्सना दसऱ्याच्या शुभेच्छा.
सर्व ‘बांधवांसाठी’ एक दसऱ्याची खास चित्र-भेट. हे चित्र बघीतल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल नाही का.. ‘रावण असणं नेहमीच वाईट असते असं काही नाही.!!!’ :-)

Being Rawan

Being Rawan